बहुजननामा ऑनलाईन टीम – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर काल विधानसभेत सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि काही अपक्षांच्या जोरावर या नव्या सरकारने १६९ आमदारांच बहुमत सादर केलं. यावेळी ४ पक्षाच्या नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर हंगामी अध्यक्ष बदलल्यामुळे आणि नियमबाह्य अधिवेशन बोलवल्यामुळे भाजपा आमदारांनी पहिले सभागृहात आणि नंतर सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडी सरकारवर बोचरी टीका केली.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो अपलोड केला आहे. ज्यात काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, तर काही गाडीच्या वर बसलेली दिसतात. या फोटोसोबत ‘कब्जा तो बहुमत से किया, लेकिन एक को भी चलाना नही आता !’ अशी कॅप्शन लिहिलं आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1200812204821549057
दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे निकालानंतर, मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपातील वाद वाढल्याने महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबतीने महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केलं. मात्र भिन्न विचारधारा असलेल्या पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा विरोधी पक्ष भाजप करत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार कसं चालवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.