रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोना वाढीमुळे हाहाकार माजला आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीवर धक्कादायक खुलासा केला आहे. तहसिलदारांनी मुंबईकरांना थेट गावात सोडल्यामुळेच रत्नागिरीसह कोकणात कोरोना रुग्णसंख्या वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सामंत म्हणाले, तहसिलदारांनी स्वॅब टेस्ट केलेल्या नागरिकांना त्यांचे रिपोर्ट येण्यापूर्वीच थेट गावात सोडले. मंडणगड, दापोली आणि संगमेश्वरमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. मंडणगड, दापोली संगमेश्वरच्या तहसिलदारांवर कुणाचा होता दबाव? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप आमदारांच्या कोकण दौर्यावरुन शिवसेना – भाजपमध्ये राजकारण तापले आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यानी रेड झोनमधून आलेल्या भाजप आमदारांनी आधी स्वत: क्वारंन्टाइन व्हावे आणि मगच कोकणात फिरावे अन्यथा कोकणात कोरोना फैलावाचा धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना दरेकर यांनी राज्यात दौरे करणार्या गृहमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांना आधी क्वारन्टाइन करा, मगच भाजपाबध्दल बोला, असे सामंत यांना सुनावले आहे. त्यामुळे कोरोनावरुन कोकणात सेना भाजपामधील राजकारण तापल्याचे दिसत आहे.