नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या संकटाचा सर्वाधिक परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला असून आर्थव्यस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान रेपो दराच्या या कपातीमुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.
शक्तीकांता दास यांनी रेपो रेटमध्ये कपात केल्याने रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के राहणार आहे, मात्र, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्केच कायम राहणार आहे. ‘संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे, मात्र महागाई दर नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आरबीआयला असल्याचे शक्तीकांत दास यांनी म्हंटले.
रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतात, त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला ‘रेपो रेट’ असे म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला ‘रिव्हर्स रेपो रेट’ म्हणतात.