बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर तालुक्यात शिक्रापूर(Shikrapur) येथील वेळ नदीच्या पात्रातून गेलेल्या गटारलाइनचे पाणी ग्रामपंचायत कर्मचारी काढत असताना त्या गटारलाइनमधून एका महिलेचा मृतदेह बाहेर आला आहे, मात्र सदर महिलेचा खून झाल्याचा संशय असून याबाबत सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील महाबळेश्वर नगर परिसरात गटारलाइनचे पाणी अडकून राहत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी बबलू शेख, सिकंदर शेख हे जेसीबीच्या सहाय्याने गटारलाइन स्वच्छ करत असताना अचानकपणे गटारलाइनमधून एका महिलेचा मृतदेह बाहेर पडला, याबाबत माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस हवालदार दत्तात्रय होले, पोलीस शिपाई विकास पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पाहणी केली असता सदर गटारलाइनमधून बाहेर पडलेल्या महिलेच्या दोन्ही हातांच्या शिरा कापलेल्या, महिलेच्या गळ्यात तारेने आवळलेले असल्याचे आढळून आले तर सदर गटारलाइन पासून काही अंतरावर गटारलाइनच्या एका चेंबरचे तोंडाला मोठा बोगदा असलेल्या ठिकाणी देखील महिलेच्या गळ्यात असलेली तार बांधली असल्याचे निदर्शनास आले, त्यांनतर पाहणी केली असता महिलेचा खून करून मृतदेह गटारलाइनमध्ये टाकला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे, यावेळी पोलिसांनी सदर महिलेबाबत आजूबाजूला माहिती घेतली असता काहीही माहिती मिळू शकली नसून महिलेचे नाव पत्ता समजू शकला नाही, याबाबत सिकंदर इस्माईल शेख रा. महाबळेश्वरनगर शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सध्या आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.