मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्यासह पावसाची शक्यता आहे. 2 जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होणार आहे. त्याशिवाय 3 आणि 4 जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल.
विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.