मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात मिशन बिगीन मोहिमे अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी संपूर्ण टाळेबंदी हटवण्यात आली नाही. तथापि ही टाळेबंदी कधी उठवली जाणार याबाबत नागरिकांना प्रश्न पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. ‘कोरोनाचा धोका अद्यापही कायम असून राज्यात दुसरी लाट येऊन द्यायची नाही त्यासाठी टाळेबंदी उठवण्याची घाई नसल्याचे’ मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘टाळेबंदीतून कधी बाहेर येणार यापेक्षा टाळेबंदी कसे हटवणार हे महत्वाचं असल्याचं’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोविड-१९ फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि आणि डॉ. राहुल पंडित यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी टाळेबंदी संदर्भात आपले मत व्यक्त केलं. गरिबांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला याची आपणास पूर्ण कल्पना असून घाई गडबडीत शाळा सुरु केल्या आणि जर शाळेत कोरोनाचा संसर्ग पसरला अथवा कार्यालये पूर्णपणे उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा प्रसार झाला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही.
दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याने ती कशी रोखायची याची तयार सुरु करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी टाळेबंदी उठवण्याची घाई करण्यात आली. तिथे पुन्हा टाळेबंदी करावी लागत आहे. म्हणून संपूर्ण टाळेबंदी उठवण्याऐवजी टप्प्या टप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कोरोना संसर्गाची बाधा फक्त जेष्ठांना होते. लहान मुलांना होत नाही, याबद्दल नागरिकांत संभ्रम आहे. अमेरिकेतील शाळा सुरु केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुलांना कोरोना संसर्गाची लागण झाली. सहा महिन्यांच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ शकते. म्हणून अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.