पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Punit Balan Group (PBG) – Constitution Park Pune | भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (Lt Gen Ajai Kumar Singh) यांनी केले.
भारतीय लष्कर (Indian Army) आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan), माणिकचंद ऑक्सिरीच (Manikchand Oxyrich) व ‘माणिकचंद ग्रुप’च्या (Manikchand Group) अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal-Balan) आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उप विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रांत नाईक ( Maj Gen Vikrant Naik) हे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अजय कुमार सिंग म्हणाले की, ‘‘संविधान उद्यान चौकाचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. जगात भारताचे संविधान विशेष असे आहे. ज्यांनी संविधानाची कल्पना मांडली आणि ते तयार केले हे अत्यंत महत्त्वाचे काम होते. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. बदल्यात परिस्थितीनुसार त्यात बदल झाले हेही महत्वाचे आहे. या संविधानात आपल्याला मुलभूत असे अधिकार दिले असून त्यात आपल्या कर्तव्यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत. असे केले तर २०४७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’’
भारतीय सैन्य आणि प्रामुख्याने साऊथ कमांड यांच्याकडून पुणेकरांसाठी हे संविधान उद्यान उद्यान विशेष अशी भेट आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्या समजतील. तसेच संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असून त्यासाठी सिंग यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.
‘‘आपला देश ज्या संविधानावर चालतो. त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मुलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.’’
* पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
काय आहे संविधान उद्यानात?
लष्कर भागात असलेल्या या संविधान उद्यानात भारतीय ससंदेच्या प्रतिकृत्तीवर राजचिन्ह असलेली तीन सिंहांची प्रतिकृती असून त्यावर संविधान लावण्यात आले आहे. तसेच उद्यानाच्या परिसरात संविधानातील नागरिकांची अकरा कर्तव्ये यांची माहितीही देण्यात आली आहे.