नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – जसे महाविकास आघाडीचे सरकार आले आहे तसे भाजपचे नेते सतत हे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत. यावरूनच सार्वजनिक बांधकाम आणि पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेले सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालणारे असल्याने ते पाचच काय तर पुढचे १५ वर्ष चालेल, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नांदेड मधील भोकर या होमग्राऊंडवर गेले होते. तिथे भोकरमधील लोकांनी मोंढा येथे अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमित चव्हाण यांचा नागरी सत्कार केला.
मागील सरकारने पाच वर्षात मराठवाड्याला काहीच मिळू दिले नाही. तसेच मराठवाड्याचा अनुशेष भरला नाही. याबाबत बोलताना चव्हाण यांनी ‘उपारवाला जब देता है, छप्पर फाड के देता है,’ असे म्हणत नांदेड जिल्ह्याला आणि मराठवाड्याला सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याचा विकास करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच बारामतीला झुकते माप देऊ शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देऊ शकणार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.