मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंबंधीचा अंदाज वर्तवला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यानंतर साधारण १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यभरात मतदानप्रक्रिया पार पडेल, असे त्यांनी पिंपरी येथे बोलताना सांगितले. आज दुपारी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. आत्मविश्वास दुणावलेल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी हि आनंदाची बातमी असून ते यादृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत ‘अब की बार २२० पार, फिर एक बार शिवशाही सरकार’ अशी घोषणा दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन महायुतीच्या पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यास महायुती तयार झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात रथयात्रा काढणार असून लोकभेत मिळविलेल्या यशाचा फायदा घेण्यासाठी हि रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून जोरदार लढाई सुरु असताना विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष बरोबर निवडणूक लढविणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.