नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील सवाई माधवपूरमधील मकसूदनपुरा येथे गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू आहे. यामुळे कोटा विभागातील पश्चिम रेल्वेच्या ५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या आंदोलनामुळे दिल्ली- मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
गुज्जर समाजाने यापूर्वीही खूप वेळा अशी आंदोलने केलेले आहेत, पण येथील तत्कालीन सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही त्यामुळे पुन्हा आरक्षणाचा मुद्दा घेऊन गुज्जर समाज आक्रमक झाला आहे.
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका गुज्जर समाजाने घेतली आहे. गुज्जर समाजातील एका सदस्याने म्हटले आहे की, आमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान चांगले आहेत. त्यासाठी त्यांनी गुज्जर समाजाच्या मागण्या जाणून घ्याव्यात. आमच्या आरक्षणासाठी मागणी पूर्ण करणे त्यांच्यासाठी मोठे काम नाही.
गुज्जरांसह पाच जातींचा अतिमागास प्रवर्गातून एक टक्का आरक्षणाला याआधी राज्य सरकारने दिली होती. अति मागास प्रवर्गामध्ये गुज्जर समाजासह बंजारा, गडीया, रेबारी व गदरी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर गुज्जर समाजाने आंदोलन मागे घेतले होते. मात्र आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा गुज्जर समाजाने दिला होता. त्यानुसार गुज्जर समाजाने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.