फरूखाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या फरूखाबादच्या ओलिस प्रकरणाचे संकट युपीच्या पोलिसांनी यशस्वीपणे संपवले. यामध्ये मुलांना ओलिस ठेवणारा माथेफिरू सुभाष बाथमला एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. मात्र आरोपी सुभाषला ठार केल्यानंतर त्याची पत्नी रूबी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी तिला पकडले आणि तिला बेदम मारहाण केली. पोलिसांनी जखमी झालेल्या रूबीला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, तेथे तिचा मृत्यू झाला.
#UPDATE IG Kanpur Range Mohit Agarwal: The woman has succumbed to injuries, we are waiting for post mortem report, further details on cause of death will only come out after the report. #Farrukhabad https://t.co/Qd85Hg7AtM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 31, 2020
कानपुर विभागाचे आयजी मोहीत अग्रवाल यांनी सांगितले की, जमावाने बेदम मारहाण केलेल्या महिलेला वाचविण्याचा खुप प्रयत्न करण्यात आला. तिला ताबडतोब रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु, तिथे तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टममध्ये हे स्पष्ट होईल की या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला आहे. डीजीपी ओपी सिंह यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 23 मुलांना वाचवणार्या युपी पोलिसांच्या पथकाला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ते म्हणाले, हे ऑपरेशन आयजी आणि डीएम तसेच एसपींच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले. मारण्यात आलेल्या आरोपीवर 2001 मध्ये गावातील एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणात सध्या त्याला जामिन मिळाल्याने तो बाहेर आला होता.
गृह खात्याचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले की, सर्व मुले सुरक्षित आहेत. घराच्या आत मुलांना ओलिस ठेवल्याने ऑपरेशनला जास्त वेळ लागला. सर्व 23 मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत. पोलिसांच्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम ठार झाला आहे. आम्हाला आनंद आहे की हे ऑपरेशन यशस्वी झाले. आरोपी सुभाष बाथमने गुरुवारी दुपारी परिसरातील 23 मुलांना आपल्या घरी बर्थडे पार्टीच्या बहाण्याने बोलावले होते, त्यानंतर त्याने सर्व मुलांना ओलिस ठेवले. आरोपीशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला, ज्यानंतर पोलीस पथकाने संपूर्ण परिसराला घेराव घातला.