औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद महापालिकेची निवडणूक समोर आली असतानाच शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून नाराज असल्यामुळे, सध्याचे भाजपचे किशनचंद तनवाणी हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह शिवधनुष्य हाती घेण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर राजकीय क्षेत्रात सुद्धा बदल होऊ लागले आहेत.
मूळचे शिवसेनेचे असलेले तनवाणी ह्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता,परंतु इथे सुद्धा आपल्याला डावलले जात आहे असे वाटल्यामुळे ते आता आपल्या सहा ते सात नगरसेवक समर्थकांसह परत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे औरंगाबाद महापालिकेत सेना-भाजप ची सत्ता होती, परंतु लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएम चे इम्तियाज जलील हे विजयी झाले.
त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला कमजोर पडल्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच राज्यात भाजप – सेना वेगळे झाल्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे नुकसान महापालिका निवडणुकीत होऊ नये यासाठी शिवसेना खबरदारी घेत आहे. निवडणुकीच्या आधीच सेनेने नाराज तनवाणींना आपल्याकडे वळवले आहे. राज्यात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेनला फायदा झाला आहे.