मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – मुंबईत येत्या २६ जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. पण ही घोषणा झाल्यानंतर या निर्णयावर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. घोषणा झाल्यापासून हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. राज्य सरकारच्या या नाइट लाइफच्या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शविला आहे. भाजपाच्या या विरोधानंतर कामगारमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांनी अगोदर अभ्यास करावा, असे म्हणत भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.
याबाबत बोलताना मलिक म्हणाले, मुंबईतील 24/7 नाईट लाईफचा जो प्रस्ताव आहे, त्यात फक्त हॉटेल्स, दुकाने, मॉल्स यांनाच पूर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. बार, क्लब किंवा मद्य दुकाने यांना परवानगी नसणार आहे. या निर्णयामुळे जिथे सन्नाटा असतो, अशा ठिकाणी होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. निर्णयामुळे लोकांना सुविधा मिळणार असून मुंबईतील ट्रॅफिकही कमी होईल, असे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच, या निर्णयामुळे रोजगारनिर्मिती होणार असून सरकारचा महसूलही वाढीस लागेल. त्यामुळे, विरोधकांनी विरोध करण्यापूर्वी प्रस्तावात देण्यात आलेल्या बाबींचा पूर्ण ‘अभ्यास’ करावा, असा टोलाही मलिक यांनी लगावला.
नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी
दरम्यान, मुंबईत नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफ ची घोषणा
1) मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफचा प्रयोग
2) हॉटेल्स ,मॉल , दुकाने २४ तास चालू राहणार
3) सुरुवातीला काळा घोडा, बी केसी ,नरिमन पॉईंट यथे प्रयोग