औरंगाबाद बहुजननामा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकसाठी ६४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली जात आहे. त्यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे मागणी केली असता हे स्मारक १० कोटी रुपयांमध्येच बांधण्यात यावे, याबाबतचे पत्र युती शासनानेच दिले आहे. त्यात विशेष म्हणजे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी शासनाने ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कारभारामुळे शिवसेनेचे अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत.
औरंगाबादच्या सिडको येथील एमजीएम भागात असलेल्या प्रिदर्शनी परिसरात शिवसेनाप्रमुखांच्या नावे स्मृतिवन तसेच स्मारक उभे करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतर्फे ५ कोटींचा निधी देऊ केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या स्मारक बांधणीची रूपरेषा ठरवली. यासाठी महानगरपालिकेने ६४ कोटी ४० लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. हि निविदा स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमुळे रखडली. ज्यामूळे महानगरपालिकेची तिजोरी आता रिकामी झाली आहे. त्यामुळे स्मारक बांधणीसाठी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे निधी संदर्भात प्रस्ताव मांडला . त्या प्रस्तावावर कक्ष प्रमुख प्रदीप पाटील यांनी पत्र पाठवून २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा हवाला देऊन स्मारक हे १० कोटी रुपयांच्या मर्यादेतच बांधण्यात यावे असे सांगितले.
याउलट गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादमधील स्मारकास ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी लागू केला आहे. शासनाच्या या आदेशामुळे शिवसेनेचे महानगरपालिकेचे अधिकारी हे अवाक् झाले आहेत. यावर नंदकुमार घोडले म्हणतात कि , मुख्यमंत्री स्मारकासाठी लागणार निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे शासनाकडून निधी जरूर मिळेल. पालकमंत्र्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. त्यामुळे ६४ कोटी रुपयांची निविदा सुरूच ठेवणार आहे. असे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले.