बहुजननामा ऑनलाईन – सोमवारी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यात केंद्र सरकारने कलम ३७० मधील काही तरतुदी शिथिल केल्या आहेत. त्याचबरोबर जम्मू- काश्मीर आणि लडाख यांचे विभाजनही करण्यात आले. या निर्णयावर काहींनी कौतुक केले तर काहींनी या निर्णयाचा विरोध केला. या निर्णयावर पाकिस्तान मात्र चांगलाच संतापला आहे. तर दुसरीकडे अमिरिकेने सावध भूमिका घेत भारताच्या या निर्णयानंतर सूचक इशारा दिला आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे आंतराष्ट्रीय स्तरावरून काश्मीर मुद्यावर बारीक लक्ष असल्याचेही सांगितले.
अमेरिकेच्या मॉर्गन ऑर्टेगस यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या जम्मू काश्मीरच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तानकडे एलओसीवर शांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्याचे आवाहन करत आहोत. जम्मू – काश्मीरच्या घनाक्रमावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. तसेच जम्मू- काश्मीरला मिळणाऱ्या संविधानिक अधिकार संपवण्याच्या भारताच्या घोषणेचीही आम्ही दखल घेतलेली आहे, असेही मॉर्गन ऑर्टेगस म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यावर होणाऱ्या कारवाईबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही भारताला आवाहन करतो की भारताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखावा आणि संबंधित नेत्यांचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावीत तसेच अमेरिकेने सीमा रेषेवर शांती ठेवण्याबाबतही आवाहन केले आहे. मात्र हे सांगताना अमेरिकेने पाकिस्तानचा उल्लेख केलेला नाही.
काही आठवड्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भेट घेतली होती. यावेळी इम्रान खानने डोनाल्ड ट्रम्पला भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वादात हस्तक्षेप करण्याबाबत सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आता भारताने जम्मू- काश्मीरबाबत मोठा निर्णय घेतल्याने पाकिस्तान सध्या चवताळला असून अमेरिकेने सावध भूमिका घेत भारताला शांतता राखण्याविषयी आवाहन केले आहे.