बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसल्याचे आकडेवारीवरून समोर आलय त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या पर्यायाचा अनेकजण विचार करीत आहेत. मात्र येणारी विधानसभा लक्षात घेऊन ‘वंचित’शी आघाडी केली तरी काँग्रेसचा घटलेला जनाधार त्यातून कसा मिळणार, हा प्रश्न काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.
लोकसभेपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने राज्यभरात ४१ लाखांपेक्षा जास्त मते घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपला २७.५९ टक्के तर शिवसेनेला २३.२९ टक्के अशी युतीला एकूण ५०.८८ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला १६.२७ टक्के तर एनसीपीला १५.५२ टक्के अशी ३१.७९ टक्के मते मिळाली. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मिळून १४ टक्के मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आणि एमआयएम यांची मते जर आघाडीला मिळाली तरी ती ४५.७९ टक्के मते झाली असती. वंचित बहुजन आघाडीची मुख्य व्होटबँक ही दलित व मुस्लिम जनता आहे. परंतु कधी काळी ही व्होटबँक काँग्रेस पक्षाची होती. त्यामुळे आगमी काळातील निवडणुका समोर ठेऊन वंचित चे करायचे काय हा प्रश्न काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.
दोन्ही पक्षांची नजर एकाच वोटबँकवर असल्याने ते एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी एकत्र येतील, याची शक्यता राजकीय जाणकरांना कमी वाटते. दुसरीकडे एकत्र आल्यास दलित-मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या मतदारसंघांकरिता या पक्षांचे आपापसात एकमत होणे कठीण असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे.
त्यातच प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारे काँग्रेसने समान पातळीवर येऊन आमच्याशी चर्चा करावी, हे बोलत आहेत, त्याला फारसा प्रतिसाद या दोन्ही पक्षांकडू मिळेल, याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकरांना वाटतंय.