औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत शहर विकासाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले कि, अफवा पसरवून शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी. शहरात शांतता राखून औद्योगिक विकासासह रेल्वे व विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती इम्तियाज यांनी दिली.
अवैध व्यवसायाविरोधात पुन्हा संघर्ष करणार असून औरंगाबाद शहरात शांतता आणि विकाससाठी अवैध धंदे बंद होण्याची गरज आहे. निवडणूक निकालानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे काही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. शहराची शांतता भंग करू पाहणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. जातीय तेढ निर्माण करणारा माझ्या किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विमान कनेक्टिव्हिटीकरिता स्पाईस जेट, इंडिगो आदी विमान कंपन्यांच्या व्यवस्थापनाची भेट घेणार आहे. त्यांना औरंगाबाद येथून जेट एअरवेजला मिळणाऱ्या प्रवाशांची संख्या, कार्गोची माहिती देऊन विमान सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
गुटखा बंदीबद्दल बोलताना इम्तियाज म्हणाले कि, कुठे गुटखा विक्री सुरू आहे, ते सांगा अशा अवैध व्यवसायावर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे २० वर्षांपासून खासदार होते. आता जनतेचा कौल मला मिळाला आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी आखलेले अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.