कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – जेव्हा महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते त्यावेळी अठराव्या शतकात राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करून धनगर समाजातील तरूणांनी विविध ज्ञानाच्या प्रातांत प्रगती करण्याची गरज आहे’, असे मत प्रा. संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी बिंदू चौक येथे ‘अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. सोनवणी बोलत होते. आजमितीला राजकारणात धनगर समाजाचे प्रतिनिधित्व दिसत नाही हे चित्र बदलण्यासाठी धनगर समाजातील समाजसुधारकांच्या विचार आत्मसात केले पाहिजे. ज्ञानाच्या क्षेत्रात तरूणांनी चांगली कामगिरी करत उद्योजक, इतिहासकार, व्यावसायिक, शिक्षक, संशोधक व्हावे. अहिल्यादेवी कुशल प्रशासक, योध्या होत्या. त्यांच्या कार्यावर इंग्लडमधील कवीने पहिले खंडकाव्य लिहिले आहे. जयंतीनिमित्त त्यांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांच्या कामगिरीचा वर्तमान परिस्थितीशी संबंध जोडणे आवश्यक आहे.
कार्यक्रमावेळी राघू हजारे यांनी स्वागत केले. बयाजी शेळके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बबनराव रानगे, वसंतराव मुळीक, नितीन काकडे, पांडूरंग शेळके, बंडोपंत बरगाले, अंबाजी बोडेकर, नाना लांडगे, शामराव माने आदी उपस्थित होते. शहाजी सिद यांनी आभार मानले.
दरम्यान ,’धनगर समाजाचे श्रध्दास्थान मल्हारराव होळकर यांच्या आणि धनगर समाजाविषयीच्या चुकीच्या आशयावर आधारित ‘पानिपत’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यास कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने विरोध करावा’, असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी केले.