बाराबांकी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. या प्रकारामुळे उत्तरप्रदेशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यानी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गावातील एका दुकानातून काही गावकऱ्यांनी दारू विकत घेतली होती. मात्र दारू प्यायल्यानंतर त्यांची दृष्टी गेली. तसेच इतरही त्रास सुरू झाला. दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर अनेक जण आजारी पडल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात २१ फेब्रुवारीला विषारी दारू प्यायल्याने १२७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.