औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध: पतन झाले आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळता येत नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना असेल. कॉंग्रेसशी आघाडीबाबत दोन दिवसांत बोलणार आहे. दोन दिवसात आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला भाजपची बी- टीम म्हणणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रवादीला आपले कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीचंद पडळकर यांनी कॉंग्रेसला ४० जागा देण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. आम्ही आमचे २८८ उमेदवार जाहीर करेपर्यंत आमची कॉंग्रेसला दिलेली ही ऑफर कायम आहे. असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी तिहेरी तलाकबाबतच्या सुधारित कायद्यावरही टीका केली. तसेच ईव्हीएम घोटाळा झाला. ईव्हीएमप्रकरणी स्टंट करून चालणार नाही. तो घोटाळा झाला नसता तर लोकसभेत भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी निवडणूक झालीच नसती. असा दावा त्यांनी यावेळी केला.