लातूर : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा पुजारी असलेल्या गोंधळी समाजाने महाराष्ट्रात एकसंघ शक्ती उभी करून तरुण पिढीने शैक्षणिक क्रांतीने आपले सामाजिक, राजकीय अस्तित्व जोपासले पाहिजे, अशी अपेक्षा लातूर महावितरणचे अधीक्षक अभियंता नंदेश माने यांनी व्यक्त केली.
गोंधळी समाजबांधवांनी हॉटेल मानसच्या सभागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंधळी समाजाचे व भटक्या विमुक्त चळवळीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र वनारसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गजानन गोंधळी, उदगीरचे नायब तहसीलदार राजेश जाधव, माजी नगरसेवक वसंत इगवे उपस्थित होते.वनारसे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत व लोकसभेत गोंधळी, वासुदेव, जोशी, गोसावी, नाथपंथी अशा २८ जातींचा समाज असलेल्या खिवारी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी गोंधळी समाजाने पुढाकार घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिनिधीत्व केले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी टेलिफोन डायरी व दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. यावेळी लातूर शहर गोंधळी समाजबांधव संघटनेच्या वतीने प्रभाकर घोडके, प्रेमानंद उबाळे, देविदास शिंदे, संगीता इगवे, दीपक वाडेकर, समीर नवरखेले, नागनाथ काळे, प्रल्हाद बडगे, नागनाथ साळुंके, संतोष इगवे यांना पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक प्रा. राजेश भांडे यांनी केले. सूत्रसंचलन माधव क्षीरसागर तर आभार दत्तात्रय काळे यांनी मानले.