बीड : बहुजननामा ऑनलाइन – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करूनही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना महामंडळाच्या कार्यालयासमोरच बेरोजगार तरूणांसह ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे.
करपे यांनी पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातून बेरोजगारांनी ४ हजारावर कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत. राज्य शासनाकडून ३०० प्रस्ताव मंजूर करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनास मिळाले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणाचे स्वप्नभंग होण्याची शक्यता झाली आहे. याबाबत आवाज उठविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ११ जानेवारीपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, पाटबंधारे वसाहत, नगर रोड बीड येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात संबधीत बेरोजगारांनी सहभागी होण्याचे आवाहन धनंजय मुळे, मचिंद्र गावडे, डॉ.अभिजीत महेंद्रवाडीकर, डॉ.माऊली राख, संग्राम शिंदे, भरत मुळे, सुग्रीव करपे, दिलीप तपसे, राहूल मुळे, हर्षद मुळे, दत्ता करपे, पद्माकर शिंदे, माणिक गरड, रमेश शेवाळे, अभिजीत ठोले यांनी केले आहे.बेरोजगार तरूणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे.
यासाठी जिल्ह्यातून ४ हजार तरूणांनी महामंडळाकडे कर्जासाठी नोंदणी केली आहे. परंतु आता जिल्ह्यातील बॅंकांसाठी केवळ ३०० कर्जप्रकरणे करण्याचे टार्गेट देण्यात आल्याने आधीच कर्ज देण्यासाठी नकार घंटा वाजविणाऱ्या बॅंकांना टार्गेटचे आयतेच कोलित मिळणार आहे. त्यामुळे यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षांनी बीडमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सर्वच्या सर्व पात्र उमेदवारांना कर्ज देण्यासाठी बॅंकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी कुलदीप करपे यांनी केली आहे.