मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांनी मते मिळविण्यासाठी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात परंतु यात्रेच्या नादात राजधर्म विसरून राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. इतर कोणत्याही शेतकऱ्यावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नका. असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोला शहरात येण्याच्या आदल्या दिवशीच जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या अनास्थेमुळे त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. मुख्यमंत्री या ६ शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी एवढ्या गंभीर घटनेनंतरही त्याची दखल न घेता आणि शेतकऱ्याची भेट न घेताच दौरा आटोपला. या बाबीचा अशोक चव्हाण यांनी निषेध केला.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती आहे. तरीही महाजनादेश यात्रा काढून मते मागायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. परंतु आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ही बाब लाजीरवाणी आहे. ज्या मुरलीधर राऊत यांनी नोटबंदीच्या काळात प्रवाशांकडे पैसे नसताना त्यांना विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली. त्यांचं मोदींनी मन की बात मधून कौतुक केले. परंतु त्याच शेतकऱ्यावर आज शासकिय अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ आली हे लाजिरवाणे आहे.
या सहा शेतकऱ्यांमध्ये दीड वर्षांपुर्वी आत्महत्या केलेल्या शेतकरी भारत टकले यांच्या पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. परंतु मुख्यमंत्री अकोल्यात असताना त्यांनी या सहा जणांना भेटून त्यांची विचारपूस करावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी साधी मागणी केली जात होती. परंतु त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. हे दुर्देव आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले.
भुसंपादनानंतर योग्य मोबदला न मिळाल्याने धुळे जिल्हयातील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. परंतु शेजारच्या जमीन मालकाचे मंत्र्यांसोबत चांगले लागेबांधे आहेत. म्हणून त्याला चांगले पैसे मिळाले. अशी तक्रार धर्मा पाटील यांची होती. तोच प्रकार येथेही होत आहे. अशी तक्रार शेतकरी करत आहेत. नांदेड जिल्ह्यातही हीच तक्रार आहे. हदगाव, अर्धापूर, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यांना मिळालेला मोबदला अतिशय कमी असून वाढीव मोबदल्यासाठी शेतकरी आणि मी दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. असेही त्यांनी सांगितले.