औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप रिपाइं (आठवले गट) ला १६ ते १८ जागा देण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेलाही आमचा फायदा झाला आहे. त्यामुळे सेनेनेही आपल्या कोट्यातून काही जागा द्याला पाहिजे अशी भावना नुकतेच सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री झालेले अविनाश महातेकर यांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी सुभेदारी गेस्ट हाऊस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपुरा येथे बैठका घेतल्या. त्यावेळी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरे दिली.
आगामी विधानसभा निवडणूकीत किती जागा मिळतील, संभाव्य उमेदवार कोण अशी चर्चा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकित झाली. त्यावेळी भाजपच्या कोट्यातून १६ ते १८ जागा आम्हाला मिळण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला तर आधीपासूनच पाठींबा आहे. परंतु धनगर व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे. सर्वांना सोबत आणण्यासाठी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्यायला हवे. तसेच वंचित बहुजन आघाडीचा या निवडणूकीत काय परिणाम होईल असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोकसभा निवडणूकीत जसा झाला तसाच परिणाम यावेळीही होईल.