पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना १६७३१ कडुलिंबाची रोपे वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्टेजच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे होते. पण, पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले.
स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत १६७३१ कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे सुद्धा उपस्तिथ होते. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मंचाच्या बाजूला काहीसा गोंधळ झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे होते परंतु पोलिसांनी त्यांना अडवले.
काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठातील भोजनालयातील (रेफेक्टरी) जेवणामध्ये सातत्याने अळ्या आढळून आल्या होत्या. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. त्यातच विद्यापीठाने रेफेक्टरी मध्ये जेवणासाठी नवी नियमावली तयार केली. हे नवीन जाचक असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्याविरोधात विद्यापिठ प्रशासनाने कडक कारवाई करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी (३५३ ) सह इतर गुन्हे विद्यार्थ्यांवर दाखल केले होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थी सोमनाथ लोहार मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी चालला होता तेव्हा हा गोंधळ झाला. विद्यापीठ प्रशासन भोजनालय ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.