औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून फिसकटल्याने वंचित बहुजन आघाडीने राज्यामध्ये त्यांचे उमेदवार उभे केले. त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपाची बी टीम असल्याचा प्रचार केला. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत लवकर निर्णय घ्यावा असा निर्वाणीचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आम्ही २८८ जागा जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांना आमची ऑफर राहिल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच लोकसभेत आम्ही भाजपची बी टीम आणि विधानसभेत सोबत या हे काय आहे ? याचा खुलासा देखील काँग्रेसने करावा, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. तर काँग्रेस ४० जागा सोडणं अशक्य असून लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्याता व्यक्त करण्यात येत आहे. जर काँग्रेसला वंचित सोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही ४० जागांची ऑफर देत आहोत. वंचित सोबत जायचे कि नाही याचा निर्णय दोन दिवसांत जाहीर करावा असा निर्वाणीचा ईशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
हा पक्षाच्या धोरणांचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपा-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पक्षातील नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात जाणे म्हणजे पक्षाच्या धोरणाचा पराभव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. दोन्ही काँग्रेसला आपले कार्यकर्ते सांभाळता येत नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.