पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले होते. हिंदू समाजाचा अवमान करणाऱ्या उस्मानी विरोधात कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. याप्रकरणी शारजिल उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारमधील अनेक नेत्यांनी उस्मानी याने केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एल्गार परिषदेवरुन निवृत्त न्यायमूर्ती व एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. शरजिल उस्मानने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा शब्दात त्यांनी बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला आहे. मात्र, आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे, त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार
एल्गार परिषदेला परवानगी का दिली या विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमके कोण येणार ? काय बोलणार ? याचा आम्हाला माहिती असते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडे प्रकरणात हस्तक्षेप नाही
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या मुलांचे पोलिसांनी काल जबाब घेतले आहेत. यामध्ये कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महापालिका निवडणुका गनिमी काव्याने लढणार
पुणे महापालिका निवडणूक गनिमी काव्याने लढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सासूचे दिवस संपले, आता सुनचे दिवस आलेत, त्यानुसार लोक विचार करतील. निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना, काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहे. ग्रामपंचायत सारखच यश महापालिका निवडणुकीत मिळेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.