मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसे पक्ष आहे की संघटना हेच कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावे ? ही तर केवळ टाइमपास टोळी आहे, असा खोचक टोला राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यावरून मनसैनिकांनीही ठाकरेंवर पलटवार केले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करणे, याला टाइमपास म्हणतात असे ट्विट देशपांडे केले आहे.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचा विरप्पन गॅंग असा उल्लेख केला होता. त्यानंतर पुन्हा काल संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना दिलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करून एकच खळबळ उडवून दिली. मनसेच्या या आरोपावर मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोचरी टीका केली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मनसेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिवसेनेचा वाद आणखी चिघळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
दरम्यान कालच मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी तीन खणखणीत ट्विट करत आदित्य ठाकरे यांना सुनावले आहे. मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असे आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते, याला म्हणतात, टाइमपास. तसेच कोरोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचे सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते, याला म्हणतात, टाइमपास. औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली, याला म्हणतात, टाइमपास, असे म्हत आदित्य ठाकरेंना शिंदे यांनी टोला लगावला होता.