नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणती भूमिका घ्यायची याविषयी चर्चा करणार असल्याचे समजते आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर आठवडा उलटून गेला तरी राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकले नाही. बहुमत मिळूनही भाजप – शिवसेना एकत्र सरकार स्थापन करण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळेच याविषयावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत.
त्यामुळे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का ? हा निर्णय शरद पवार घेणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. परंतु इतर नेत्यांच्या मानाने शरद पवार यांच्या मताला जास्त मान असल्याने या भेटीनंतरच सेनेला पाठिंबा देण्याबाबत भूमिका स्पष्ट होणार आहे.