मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असला तरी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. भाजपचा उपमुख्यमंत्री पद आणि इतर १६ खाती असा प्रस्ताव शिवसेनेनं धुडकावून लावला आहे. निवडणुकीच्या वेळी ठरल्याप्रमाणे ५०-५० फॉर्म्युल्यानुसार अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिमंडळात सामान वाटा या मागणीवर शिवसेना अडून बसली आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल असा स्पष्ट दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितले कि, ‘ परिस्थती दररोज बदलत असते, त्यामुळे या परिस्थितीत भाजप कोणतं पाऊल उचलेल हे आज सांगता येणार नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार भाजप निर्णय घेईल, तरी निवडणूक एकत्र लढलो तसेच सरकारही एकत्र स्थापन करू असे दानवे यांनी स्पष्ट केलं.’
दरम्यान, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून शिवतीर्थावर शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. शिवसेनेकडून चर्चेत कोणतीही अडचण आलेली नाही. खोट बोलणारी मंडळीच प्रमुख अडथळा आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णयापर्यंत आले असून आम्ही लवकरच यासंदर्भात माध्यमांना कळवू , असे राऊत म्हणाले.