मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात हंगाम संपला तरी पाऊस परतण्याचे नाव घेत नाहीये. त्यात आता येत्या ६ ते ८ तारिखेपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे उत्तर कोकण तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच, समुद्रात वाऱ्याचा वेग जास्त असणार असल्याने मच्छीमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना पुन्हा किनारपट्टीवर येणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ५४ लाख २२ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यात आता हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अजून भर पडणार असल्याची शक्यता आहे.