औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून आगामी विधानसभेच्या ५० जागा लढविण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढविली जाणार असून या जागांची यादी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद आणि भायखळा (मुंबई) या दोन जागांवर एमआयएमने विजय मिळाला होता. आणि अनेक जागांवर उमेदवारांनी लक्षणीय मतेही मिळाली होती. यामध्ये परभणीसह अन्य काही मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या, तिसऱ्या जागांवर आले होते. यंदाच्या लोकसभेत एमआयएमने औरंगाबादची जागा जिंकत शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवले नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. या विजयामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.
लोकसभेत असलेली एमआयएम- वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभेतही कायम ठेवण्याबाबत खासदार असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत बैठक झाली होती. यावेळी ओवेसी यांनी आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एमआयएमने अंतर्गत सर्वेक्षण करून पक्षाचा अहवाल तयार केला. या अहवालानुसार पक्षाने ५० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एमआयएम पक्षाकडून मिळालेल्या यादीवर आंबेडकर हे अंतिम निर्णय घेणार आहेत.