मुंबई, बहुजननामा इनलाईन – महायुती असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ७२ हजार पदांची मेगा भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी महापरीक्षा पोर्टल या संस्थेकडे काम देण्यात आले होते. परंतु या संस्थेने भरती प्रक्रियेत अनेक गोंधळ केल्याने भरती प्रक्रिया मध्येच रखडली.
पण आता ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात सरपंच महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांची राहिलेली मेगा भरती करणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील शासकीय पदांची निर्मिती करून मेगा भरती करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांसमोरच सांगितले. गावच्या विकासकामात गावचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतात. मात्र एका गावात एक ग्रामसेवक न देता अनेक गावात मिळून एक ग्रामसेवक दिला जातो. पण ज्याप्रमाणे गावात सरपंच महत्वाचे आहेत, तसेच ग्रामसेवकही महत्वाचे आहेत. त्यामुळे एक गाव एक ग्रामसेवक असं करता येणार नाही का? असा प्रश्न एका गावच्या सरपंचाने विचारला होता. त्यावर उत्तर देत “सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मी पदभार स्वीकारून ४ ते ५ दिवसच झाले आहेत. पण फडणवीसांची राहिलेली मेगा भरती आम्ही करू, असे हसन मुश्रीफ म्हणाले