पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं कोरोनासंदर्भातलं एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. जयंत पाटील यांनी आता या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
“तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात कोरोना नाही असं मला वाटतंय, म्हणून मी ही मास्क काढून बोलतो,” असं वक्तव्य पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयंत पाटील यांनी केलं होतं. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता मात्र, जयंत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच, “व्यासपीठावर विनामास्क नेते बसले होते म्हणून उपहासाने बोललो,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
” कोरोना संपलेल्या अविर्भावात लोकं समोर बसली होती. चेहऱ्यावर कोणाच्याही मास्क नव्हता. कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. म्हणून मी हे उपरोधानं बोललो,”असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली असून काळे यांचा गट भगीरथ भालके यांचा प्रचार करणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.