मुंब्रा : बहुजननामा ऑनलाईन- झारखंडमध्ये ‘जय श्रीराम’ न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीत एका मुस्लिम मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातील मुंब्रा येथेही असाच प्रकार घडलाय. बंद पडलेली गाडी बाजूला घेण्याच्या वादातून मुंब्य्रातील वाहनचालकाला तिघांनी शनिवारी मध्यरात्री दिवा मारहाण केली. परंतु फैजल खान याने ‘जय श्रीराम’ न बोलल्याने मारहाण झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंगेश मुढे, अनिल सूर्यवंशी व जयदीप मुढे यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंब्य्रातील तन्वरनगर येथे राहणारा फैजल हा शनिवारी रात्री प्रवाशांना घेण्यासाठी तो दिव्यात गेला होता. तेव्हा त्याची कार रस्त्यात बंद पडली. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यात वादावादी होऊन नशेत असलेल्या तिघांनी फैजलला मारहाण केली. तेव्हा फैजलने ‘अल्लाह के वास्ते छोड दो’ असे बोलताच तिघांनी त्याला ‘जय श्रीराम’ बोलण्यास सांगितल्याचे फैजलने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान , घडलेली घटना हा मॉब लिचिंगचा प्रकार नसल्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले आहे.