सांगली : बहुजननामा ऑनलाईन – लोकांना त्रास होतोय, हे सांगणं म्हणजे राजकारण नाही असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सांगलीमध्ये पूरग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी गिरीश महाजनांचे नाव न घेता त्यांनी टीकाही केली. तर पूरग्रस्तांना चांगली घरे बांधून द्या. अशी मागणी त्यांनी केली.
पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल, पण त्यानंतर काय ? पूरग्रस्तांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. रोजगार हमी किंवा तत्सम योजनांवर लोकांना पाठवून त्यांच्या हाताला काम देणं आवश्यक आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारने मदत करण्याची गरज आहे. सांगलीतील पाणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. तरच सांगलीतील पूर ओसरेल.
राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख सर्व ठीक चालले आहे असं समजून चालले आहेत. काहीजण तर सेल्फी काढण्यासाठीच जात आहेत. तर ही स्थिती लवकर ठीक होईल असं मला वाटत नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी महाजन यांचं नाव न घेता टीका केली. तर मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका, परंतु इथे लोकांना त्रास होतोय. लोकांना होणारा त्रास सांगणं म्हणजे राजकारण नाही. असे ते म्हणाले.