जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – बुद्धिझममध्ये जात, धर्म, लिंग, प्रांत या पलिकडे जावून मानवतेचा विचार हाच केंद्रस्थानी मानला गेला आहे, असे प्रतिपादन हैदराबाद विद्यापीठातील भाषा अभ्यासक डॉ. संतोष राऊत यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळातंर्गत बौद्ध अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने कॉन्शिअसनेस इन बुद्धिझम या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. ए.बी. चौधरी होते. मंचावर बिजभाषक मंगेश दहिवले, प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, चेतना जागृती (कॉन्शिअसनेस) ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. मन हे कधीच स्थिर असत नाही. विज्ञानाने देखील चेतन जागृतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कॉन्शिअसनेस म्हणजे युनिटी असे सांगून डॉ. राऊत यांनी रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पाच उपादान स्कंध दु:खकारक आहे असे नमूद केले. बौद्ध धर्मात मानवी मूल्यांचे समर्थन करण्यात आले आहे. कॉन्शिअसनेस ही बंदीस्त नाही. अश्रू आणि दु:ख सर्वांना सारखेच आहेत त्याची जाती अथवा धर्मात विभागणी करता येणार नाही. जात, धर्म, भाषा, लिंगभेद या पलिकडे जावून एकमेकांमध्ये सुसंवाद व्हायला हवा. बौध्द धर्मात याच पध्दतीची मांडणी करण्यात आली आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. ए.बी. चौधरी यांनी सकारात्मक विचार करायला हवा आणि तोच कॉन्शिअसनेसचा पाया आहे, असे नमूद केले. प्रारंभी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजय पत्की यांनी गीत सादर केले. नीलेश जंगले व वर्षा आहुजा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बारेकर यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर मंगेश दहिवले यांचे बीजभाषण झाले. त्यानंतरच्या सत्रात प्रा. विलास चव्हाण, प्रा. अर्चना देगावकर यांनी मार्गदर्शन केले.