मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेच्या युतीने लढवली. परंतु निकालानंतर त्यांच्यात चांगलाच सत्तासंघर्ष झाला. अडीच वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असताना भाजप मात्र मुख्यमंत्री पद सोडायला तयार नव्हता. त्यानंतर भाजपकडे संख्याबळ असूनही त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यावर अनपेक्षितपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री पद हे राजकारणात अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. परंतु काही नशीबवान असलेल्यांना ते मिळून जात तर काहींचं स्वप्न हे स्वप्नच राहून जात. काही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, ज्यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. पण असेही काही आहेत ज्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली आहे. मुख्यमंत्रीपद हातून गेल्यावर महत्वाची खाती मिळालेले नेतेही राज्यात बघायला मिळतात. जसे की नारायण राणे, अशोक चव्हाण हे नेते अगोदर मुख्यमंत्री आणि नंतर महत्वाची खाती सांभाळत आहेत. परंतु उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला नेता आजतागायत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकला नाही.
वसंतदादा पाटील १९७८ मध्ये मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. नंतर शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सुंदरराव साळुंखे हे उपमुख्यमंत्री होते. १९८३ ते ८५ या काळात रामराव आदिक, १९९५ ते ९९ भाजपाचे गोपीनाथ मुंडे, १९९९ ते २००३ पर्यंत छगन भुजबळ हे तर २००३-२००४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील, २००४-२००८ दरम्यान आर.आर. पाटील तर छगन भुजबळ हे पुन्हा २००८ ते २०१० पर्यंत आणि त्यांनतर २०१०-२०१४ मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
Visit : bahujannama.com