बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपचा समाचार घेतला होता. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना ‘संजय राऊत (Chandrakant Patil)भाजपवर टीका करत असल्यामुळेच त्यांचे पद टिकून आहे,’ असा चिमटा काढला आहे. तसेच राऊत यांनी शरद पवार हेच सरकार चालवत असल्याचे मान्य केलं असल्याचे त्यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांना नेमून दिलेली ड्युटी आहे. किंबहुना त्यामुळेच संजय राऊत यांचे पद टिकून आहे. स्वतःवर टीका झाली की, राऊतांना टोचते. मुख्यमंत्री हे कारभार चालवण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेतात, हे शेवटी राऊत यांनी मान्य केले. आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचा सुद्धा सल्ला घ्यावा, अशी खोचक टीका पाटील यांनी केली.
कोरोना दरम्यान सरकारचा कारभार आणि अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मराठा आरक्षणावर महाविकास आघाडीतील नेते काहीही बोलतात. त्या ऐवजी सरकारने तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी. त्याचप्रमाणे सरकारचा कारभार उत्तम सुरु आहे अथवा नाही, हे जनतेलाच विचारा, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
शरद पवारांचा सल्ला घेतला तर कोणाच्या पोटात का दुखतंय – संजय राऊत
“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकार मध्ये असणारे जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. पंतप्रधान मोदीजी तिकडे अन्य राज्यांना मार्गदर्शन करतात, सल्ले देतात. सरकार शरद पवार यांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तद्वतच, पवारांचा सल्ला घेतला नाही तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असे म्हणत, राज्यपालांनाही पवारांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. म्हणून मी पवारांना विनंती करतो त्यांनाही सल्ला देण्याची,” असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.