मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असं ट्विट संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊत यांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग ? लोक चिडले आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, शरद पवार हे चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींबाबत जोरदार बोलले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सारकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन दिवसांत अचानक रद्द केल्या. यामुळे गृहमंत्री आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यातच पारनेर मधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे देखील ठाकरे यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे नगरसेवक परत द्या असे सांगितल्याचे समजतय. नेमक्या याच वेळी संजय राऊतांची पवरांच्या मुलाखत घेतल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये सर्व आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.