बहुजननामा ऑनलाइन टीम – भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री विश्वजीत कदम यांची पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यानंतर कदम यांनी काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्याच्या घरावर दगड फेकू नयेत. महापूर आला होता तेव्हा भाजपा नेत्यांनी काय मदत केली हे सर्वांनात ठाऊक आहे. चंद्रकांत दादांसारख्या मोठ्या नेत्याने अशी वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
मी जर रणांगणात उतरलो तर महागात पडेल असे प्रत्युत्तर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित यांना दिले आहे. एका गिरणी कामगाराचा मी मुलगा असून काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता असेही त्यांनी उत्तर दिले. विश्वजित स्वत: काचेच्या घराता राहतात आणि संस्था गायरानावर आहेत. उगाच मला उणेदुणे काढायला लावू नका. माझ्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला तेव्हा आम्ही काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज जेव्हा देश आणि राज्य कोरोनाचा सामना करत आहे, तेव्हा भंडार्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत ? याचं उत्तर त्यांनी द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वार्यावर सोडणार्या विश्वजीत कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.