मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसे कडून मोठी सभा घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी भाषण केले. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो असे म्हणत राज यांच्या भाषणाची सुरुवात होत होती. मात्र, पक्षाचं नवनिर्माण करताना राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा अन् अजेंडाही बदलल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कारण, राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच, जमलेल्या माझ्या तमाम ‘हिंदू’ बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो… असे म्हणत आपल्या भाषणातील सुरुवातीचा बदल दाखवून दिला. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, अगदी तशीच राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यामुळे, राज यांचे हिंदवी स्वराज्य हे बाळासाहेबांच्या संघटनेप्रमाणेच चालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मनसेचा झेंडा बदलला
बदलेल्या झेंड्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले , ही कल्पना २००६ सालीच मनात होती. लोकआग्रहास्तव सोशल इंजिनीअरिंगचा नाद म्हणून रेल्वे इंजिन आणि इतर रंगांचा झेंडा निवडल्याची कबुली राज ठाकरेंनी दिली. शिवरायांचं सोशल इंजिनिअरिंग त्यावेळीपासूनच डोक्यात होतं आणि म्हणूनच अधिवेशन घेतानाच हा झेंडा लोकांसमोर ठेवल्याचं राज म्हणाले. महाराजांची राजमुद्रा ही आपली प्रेरणा असून राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचं सांगत आपण आजही मराठी आणि हिंदूच असल्याची गर्जना राज यांनी केली.
झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही
झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसल्याचा टोला शिवसेनेला लगावत पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांना हाकलण्यासाठी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याचा विचार असल्याचं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोलाची आणि महत्वपूर्ण माहिती माझ्याकडे आली असून देशाच्या गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं सांगत येत्या ९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणाच्या समारोपात म्हणाले.