मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – NRC आणि CAA कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. महाराष्ट्रात देखील या कायद्याच्या विरोधात मोठ्या संख्यने लोक रस्त्यावर उतरत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. या कायद्यांविरोधात आंदोलनात राष्ट्रवादी देखील सामील झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या देशात भटका समाज आहे, त्यांना नागरिकत्व मिळेल का? असा सवाल पवार यांनी केला आहे.
याबाबत शरद पवार यांनी ट्विट देखील केले आहे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे’.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही.
ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही
आणखी एका ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाही’, असे पवार यांनी सांगितले.