औरंगाबाद ( बहुजननामा ) – सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाच्या मागण्या मान्य करु, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने आपली फसवणुक केल्याचा आरोप सकल धनगर समाजाच्यावतीने करण्यात आला आहे. भाजपला मतदान केल्याचे प्रायश्चित म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पोतराजाकडून चाबकाचे फटके मारून घेतले. समाजातर्फे भाजप सरकारविरोधात विश्वासघात सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहातमध्ये अशा प्रकारचे आंदोलन प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे.
धनगर समाजाचा पाठिंबा मिळवत भाजपने गेल्या निवडणुकीत मते मिळवली, मात्र दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही भाजपला मतदान केले, तसेच समाजबांधवांना मतदान करण्यास सांगितले. आमच्या मतांमुळे सरकार सत्तेत आले. पण, गेली पाच वर्षे समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नसल्याने भाजपला मतदान केल्याचा पश्चाताप होत आहे,’ अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
धनगर समाजाची फसवणुक करणाऱ्या युती सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण तत्काळ मंजूर करावे, हल्ले होत असल्याने मेंढपाळांना शस्त्रपरवाना द्यावा, वन विभागाने मेंढ्यांसाठी चराई क्षेत्र मोकळे करावे, मेंढपाळांना त्रास किंवा मारहाण केल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्यांना शहीद दर्जा व कुटुंबास शासकीय नोकरी द्यावी, आदी मागण्या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी अरुण रोडगे, रंगनाथ राठोड, संजय फटाकडे, डॉ. संदीप घुगरे, कैलास रिठे, दिलीप रिठे, शाम गुंजाळ, एकनाथ खटके, संतोष सुरे, रवी वैद्य, सुरज पचलोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देखील सकल धनगर समाजाच्यावतीने सरकारला देण्यात आला.