बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर केंद्रातील व राज्यातील भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “या देशात भाजपा समर्थकांना(BJP supporters) सात खून माफ आहेत का,” असा सवाल उपस्थित केला आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले, की “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना आज अटक झाल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्र्यांनी बचावासाठी पुढे आले. आत्महत्याप्रकरणात आरोपीच्या बाजूने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील, तर या देशाने मान्य करायचे का भाजपा समर्थकांना सात खून माफ आहेत,” अशी विचारणा करून त्यांनी भाजपाला पेचात पाडले आहे.
जिस तरह से केंद्र के मंत्री, एक आत्महत्या के आरोपी के बचाओ में खुल कर सामने आ रहे हैं, क्या देश यह मान ले बीजेपी समर्थकों को देश में सात खून माफ है। #ArnabGoswamiArrested
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 4, 2020
दडपशाहीविरोधात संघर्ष करणे हा भारताचा नारा – फडणवीस
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, मात्र मानसिकता कायम ! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना काँग्रेस एकत्र आल्याने त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करत आहे. सरकारविरुद्ध प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक असून, अशा प्रत्येक दडपशाहीविरोधात संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत – चंद्रकांत पाटील
आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारला आंदोलन करुन विरोध दर्शवा, उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, समाजमाध्यमात आवाज अथवा, मोर्चे काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत असेल की हे महाराष्ट्रात हुकूमशी पद्धत लागू करू शकतात. महाराष्ट्र हे कधीही होऊ देणार नाही. आजच्या पिढीला सुद्धा इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. तेव्हाही जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता सुद्धा थांबवणार, असा चिमटा पाटील यांनी ठाकरे सरकारला काढला आहे.