मुंबई : बहुजननामा ऑनलाइन टीम – २०१९ च्या विधानसभेनंतर भाजप आणि शिवसेनेची मुख्यमंत्रीपदावरुन युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि, मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. सर्वधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर लागले. ही सल भाजपच्या मनातून अजूनही गेली नाही. त्यामुळे भाजपकडून सातत्याने ठाकरे सरकारला धारेवर धरले जाते. त्यातच आता भाजप नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंददराआड भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप यांची २५ वर्षाची युती तुटली होती. मात्र, शेवटी आम्ही पुन्हा एकत्र आलो.”
“तसेच भविष्यात काय होईल ते आगामी काळात ठरेल. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली कारण त्यांना माहिती आहे सोनिया गांधी या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. परंतु, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाही,” असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मतदारसंघातील वने आणि वीजबिलांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं.
संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, मुनगंटीवारांनी जे काही सांगितले ते योग्यच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीच कोणाचे शत्रू नसते, म्हणूनच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमचे महाविकास आघाडीचे सरकार मागील १ वर्षांपासून यशस्वीरीत्या कामकाज करत असून, हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.