मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप व शिवसेनेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरुन वाद सुरु आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्ये आणि नेते आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असा दावा करत आहेत. मात्र यासंबंधी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेगळाच दावा केला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना भाजप हे मुख्यमंत्री पद विभागून घेईल, असे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेत समान वाटा म्हणजे मुख्यमंत्रिपदासह सर्व पदे विभागून घेणे, असाच होतो. त्यामुळे अडीच वर्ष भाजप व अडीच वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पद विभागून घेईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
सध्या आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेनंतर ते आगामी विधानसभा निवडणुक लढणार की नाही याविषयीचा निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य म्हणाले, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाचा उल्लेख करत आहेत. मी तो त्यांचा आशीर्वाद समजतो. पण हे लोकांकडून यायला हवे. लोकांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मी नक्कीच लढवेल. त्यांची मी सेवा करेन. मागील विधानसभा निवडणुक मी लढलो नाही कारण माझे वय २४ होते. मागील दहा वर्ष मी पक्षाच्या कामात सहभागी होतो आहे. शेतकरी,विद्यार्थी यांचे प्रश्न मी समजावून घेतले आहेत. फक्त मी प्रश्नच समजावून घेत नाही तर ते ठराविक कालमर्यादेत सोडवण्यावर ही माझा भर असतो. असे आदित्य यांनी स्पष्ट केले आहे.