कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १ ऑगस्टपासून विविध कार्यक्रामांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जन्मशताब्दी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीत आण्णा भाऊंचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला. मुस्लिम बोर्डिंग येथे शनिवारी ही बैठक झाली.
जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आयोजन केलेल्या बैठकीत अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांसह विविध जातीधर्मातील लोक उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, पोवाडे, कामगार चळवळ, सीमा लढ्यातील योगदानाबद्दल वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे ३१ जुलै रोजी शाहू स्मारक भवन येथे शाहिरी मुजरा हा कार्यक्रम होणार आहे. एक ते सात ऑगस्ट या आठवड्यात सरकारने दूरदर्शनवरून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर निर्माण झालेले चित्रपट प्रसारित करावेत, अशी विनंती राज्य सरकारला यावेळी करण्यात आली आहे. अण्णा भाऊ यांचे मुंबईतील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे, यासाठीही सरकारकडे मागणी केली जाणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अण्णा भाऊंचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी सर्व कोल्हापूरकर एकवटले आहेत.
दरम्यान, सध्या समाजात जातीपातींमध्ये अनेका वाद होताना दिसतात. तसंच राष्ट्रीय नेत्याच्या जातीवर विभागणी करून उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे कोल्हापूर मधील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आले आहेत. त्यामुळे हा जन्मशताब्दी वर्ष राज्यातील प्रत्येकासाठी आदर्श ठरणार आहे.