नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले असून आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीने चांगलीच तयारी केली असून उद्या शहरात महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे. त्याला तीनही पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये राजकीय हालचाली घडल्या असून राष्ट्रवादीच्या तब्बल ४८ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाची सत्ता आली असून आता भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून उद्या होणाऱ्या पहिल्या मेळाव्याला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित असणार आहेत.
विधानसभा निवडणूक होण्याअगोदर राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते गणेश नाईक यांनी आपला मुलगा संदीपसह भाजपमध्ये प्रवेश केला असताना ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवत ते आमदारही झाले होते. २०१५ मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही गणेश नाईक यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता राखली होती. तसेच महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार असून त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान असणार आहे.