मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आरपीआय आठवले गट 2 मे रोजी काढणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे दोन गटामध्ये हिंसाचार उफाळून आला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती ,त्यानंतर त्यांची सध्या जामिनावर सुटका झालेली आहे. मात्र, अद्यापही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही, यामुळे त्यांना अटक करावी यासाठी हा मोर्चा असणार आहे.
म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व रामदास आठवले करणार असल्याची माहिती आरपीआयचे नेते अविनाश म्हातेकर यांनी दिली.